Thursday 9 June 2011

अनामिक भीती

अनामिक भीती
तुझं प्रति टपाली आलेलं उत्तर वाचून मला अनामिक भीतीनं घेरलं. माझ्या इतर मैत्रिणींची लग्नं झाली होती. त्यांनी काहीबाही सांगून मला भेडसावून सोडलं होतं. मी भलतीच घाबरले. ही गोष्ट कुणाला सांगावी? या विवंचनेत असतांना तू आमच्या घरी आलास. निमित्त होते, लग्न पत्रिका चापून आणल्याचं. खरे तर मीच तुला बोलावून घेतलं होतं. ही गोष्ट फोनवर बोलता येणार नाही. प्रत्यक्ष भेटूनच सांगीन असे म्हटल्यावर तू लागलीच आलास. माझ्या जीवात जीव आला खरा, पण कोणत्या शब्दांत सांगावं याची चिंता वाटू लागली. नंतर मनाचा निर्धार केला. म्हटलं ह तर आपला होणारा जीवनसाथी, याच्याशी ही भीती शेअर नाही करायची तर कुणाशी? मैत्रिणींनी तर आपल्याला आधीच काहीबाही सांगून ठेवलंय. खरंच असं होतं का? हेच तुला विचारायचं होतं. मी तर कसं विचारावं या विचारानेच बावरून गेले होते बघ.
आणि त्या सायंकाळी मी तुला गावापासून लांबवर असलेल्या शिवमंदिरात नेलं. ती जागा खुच शांत होती. तिथे चिटपाखरूही नव्हतं. त्या एकांताला मीच घाबरू लागले. दाट किर्र झाडी, पक्ष्यांचे मिश्र आवाज, आपण दोघे सोडले तर कुणीही नाही. उगाच इकडे आलो असं वाटू लागलं.
पण तू म्हणालास, ‘ अगं वेडी का खुळी? कशाला घाबरतेस या निवांत निसर्गाला? ही सृष्टी बघ किती आनंदी आहे, या रम्य संध्याकाळची मौज लुटते आहे.. पानं सळसळताहेत, पक्षी मधुर कूजन करताहेत, त्यांच्या पिलांच्या भेटीचा हा दिलचस्प सोहळा फांदीफांदीवर घडतो आहे. अन् तू घाबरतेस. अगं मी आहे ना. तू एकटी का आहेस?’
तुझी ती आश्वासक वचने मनात साठवून मी पटकन तुला बिलगले! कितीतरी आधार वाटला त्यावेळी. शब्दांत सांगता येणं कठीणच. तूही मला कवेत घेऊन माझ्या पाठीवरून विश्वासक हात फिरवला अन् मला किती बरं वाटलं म्हणून सांगू?वाटलं याचसाठी लग्न करायचं असतं ना? एकमेकांना समजावून घेत, आधार देत हा सहजीवनाचा मार्ग दोघांनी एकरूप होऊन चालायचा असतो नाही का? जरा वेळ असाच त्या प्रेमळ भाव समाधीत गेला आणि अचानक तू विचारलंस, ‘काय गं आर्या, तू काय सांगणार होतीस महत्त्वाचं?’ मला तेव्हा कुठे माझ्या अनामिक भीतीची आठवण झाली. तुझ्याशी असं मिठीत एकरूप झालेले असतांना ती भीती कुठे गेली होती? जी की याचा एकरूप होण्याशी संबंधित होती. पण ती भीती आता मौका आली तर सांगूच टाकू एकदाची. म्हणजे मनावरचं मणामणाचं ओझं कमी तरी होऊन जाईल.
काहीवेळ मी बोललीच नाही. कशी सुरुवात करावी हेंच कळत नव्हते. तू पुन्हा विचारलेस, ‘ अगं सांगतेस ना? कसली काळजी वाटतेय तुला?’ त्याच्या खांद्यावर माथा टेकवून मी दीर्घ श्वास घेतला अन् सांगून टाकलं, ‘मला खूप भीती वाटतेय रे.’
‘कशाची?’
‘अं अं आपल्या पाहिल्या कॉन्टॅक्टची...’ मी हुश्श केलं. सांगितलं एकदाचं. मी निश्चिंत झाले व त्याच्या उत्तराची वाट पाहू लागले. तो स्वतः डॉक्टर असल्याने काय प्रतिसाद देतो ते जाणून घ्यायचं होतं.
‘वेडी गं वेडी. अगं हा सर्व नैसर्गिक भाग असतो. निसर्गातील हर एक कळी उमलते की नाही? मृदेला अलगद दूर करून बी अंकुरतेच की नाही? पावसाचा प्रत्येक थेंब मृदेत हळुवार विसावतोच की नाही? मग यातील कुणी रडतं का? की ते नवं होणं कुणी टाळतं का? मग तू कशाला एवढं मनाला लावून घेतेयेस ती गोष्ट?’
‘तरी पण भीती वाटतेच, खूप त्रास होतो म्हणतात. रक्त...’
‘छे छे! असलं काही चिंतू नकोस. तुला काहीएक त्रास होणार नाही याची काळजी घेईन मी. आणि तीच क्रिया महत्त्वाची आहे का? ते आपोआप मागाहून घडेलच. आधीच पाण्याला घाबरल्यावर पोहता येईलच कसे? कळतंय का?’
तुझ्या त्या संधिग्ध उत्तरानं मी आणखीनच बुचकळ्यात पडले. काही होणार नाही असे तू म्हणालास. काळजी घेईन हेही सांगितलंस. पण मला मात्र भयानक भीती लागून राहिली. तुला नकार देता येईल का? ती क्रिया कशी टाळता येईल? की तू म्हणतो तसं आपोआप उमलणं घडत जाईल का? काही काही उत्तर मिळत नव्हतं...
माझी अनामिक भीती तू देखील ‘तत्पूर्वी’ घालवू शकला नव्हतास!

No comments:

Post a Comment